अमृत महोत्सवी वर्षा निमित्य लोकाभिमुख उपक्रमाचे अहेरीत शुभारंभ
सात बारा उतारा मोफत वाटप
आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी केले शुभारंभ.
सात-बारा आता मोफत व थेट घरपोच मिळणार.
तालुका प्रतिनिधी : विस्तारी गंगाधरीवार अहेरी
राज्याचे महाविकास आघाडी सरकारने स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षा निमित्य नुकतेच नागरिकांना मोफत घरपोच सात-बारा उतारा देण्याचे लोकाभिमुख निर्णय घेतले असून शनिवार 2 ऑक्टोबर पासून अहेरीत या उपक्रमाचे शुभारंभ करण्यात आले. आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते सात बारा उतारा वितरित करून उपक्रमाचे शाही थाटात शुभारंभ करण्यात आले.
यावेळी उदघाटनस्थानी आमदार धर्मराव बाबा आत्राम होते तर अध्यक्षस्थानी सहाय्यक जिल्हाधिकारी(भा.प्र.से) श्री अंकित होते. प्रमुख अतिथी म्हणून मंचावर माजी जि. प.अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम, तहसीलदार ओंकार ओतारी, सभापती भास्कर तलांडे, पं. स.सदस्य हर्षवर्धनराव बाबा आत्राम आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्व प्रथम 2 ऑक्टोबर म. गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या जयंती निमित्य मान्यवरांच्या शुभहस्ते तैलचित्रासमोर दीप प्रज्वलित करून व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी आमदार धर्मराव बाबा आत्राम, सहाय्यक जिल्हाधिकारी श्री अंकित, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम, तहसीलदार ओंकार ओतारी यांच्या शुभहस्ते वीस शेतकऱ्यांना सात-बारा उताराची प्रत वितरित करण्यात आले असून आजच्या दिनी 2,791 सात-बारा उतारा बनविण्यात आले असून तलाठ्यांमार्फत प्रत्यक्षात घरपोच सेवा देण्यात येणार आहे. अहेरी तालुक्यातील जवळपास 25 ग्राम पंचायतीत सात- बाराची पहिली प्रत घरपोच मोफत देण्यात येणार आहे.
या प्रसंगी उदघाटनीय स्थानावरून आ.धर्मराव बाबा आत्राम म्हणाले की, महसूल विभाग नागरिकांचे आत्मा व मुख्य कणा असून आता महसूल विभागामार्फत सात बारा मोफत व तेही थेट घरपोच देण्यात येणार आहे असे म्हणत, या आधी नागरिकांना संगणकीकृत सात बारा नव्या स्वरूपात उपलब्ध करून दिले असून आता मोफत आणि थेट घरपोच सात-बाराचे उतारा देणारे देशातील महाराष्ट्र राज्य हे पहिले राज्य असल्याचे उल्लेख करून ‘शासन आपल्या दारी’ ही संकल्पना अधिक घट्टपणे रुजविली जात आहे, त्यामुळे नागरिकांचे सात बारा साठी शुल्क व त्रास वाचणार असल्याचे म्हणत मोलाचे मार्गदर्शन यावेळी आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.
सहाय्यक जिल्हाधकारी श्री अंकित यांनी, शासनाचे हे उपक्रम लोकाभिमुख व ऐतिहासिक असून नागरिकांचे आर्थिक व मानसिक त्रास वाचणार असून महसूल विभागामार्फत युद्धपातळीवर सात बारा व अन्य महत्वाचे दस्ताऐवज वेळेत उपलब्ध करून दिल्या जाईल त्यामुळे प्रत्येक योजनांचे लाभ नागरिकांनी घ्यावे असे आवाहन यावेळी केले.
यावेळी तहसीलदार ओंकार ओतारी , अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे यांनी सुद्धा आपले विचार व्यक्त केले.
संचालन नायब तहसीलदार दिनकर खोत यांनी तर उपस्थितांचे आभार नायब तहसीलदार फारुख शेख यांनी मानले.
यावेळी माजी नगरसेवक अमोल मुक्कावार, सुरेंद्र अलोने, श्रीनिवास विरगोनवार, राहुल गर्गम, अनुराग बेझलवार आदी व प्रतिष्टीत नागरिक, शेतकरी, लाभार्थी उपस्थित होते.
यशस्वीतेसाठी मंडळ अधिकारी एकनाथ चांदेकर, पुरवठा निरीक्षण अधिकारी शिल्पा दरेकर, कौसर खान पठाण, रोशन दरडे, विनोद दहागावकर, किशोर तलांडी, किशोर दुर्गे, तलाठी व महसूल कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.