वटपौर्णिमेच्या निमित्ताने तालुक्यात वृक्षारोपण

उमेद अभियानाचा नाविन्यपूर्ण उपक्रम
प्रतिनिधी:हेमंत बोरकर
चिमूर, दि. ३० जून : वटपौर्णिमेच्या पावन निमित्ताने तालुक्यातील विविध गावांमध्ये उमेद अभियानाच्या महिला बचत गटांच्या सदस्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षारोपणाचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला.
या उपक्रमात महिला बचत गटांच्या सदस्यांनी वड, पिंपळ, कडुनिंब, आंबा, करंज तसेच इतर विविध प्रकारच्या स्थानिक वृक्षांची लागवड केली. “एक वृक्ष – एक जबाबदारी” हा संदेश देत प्रत्येक लावलेल्या रोपाचे संगोपन करण्याचा संकल्पही करण्यात आला.

वटपौर्णिमा हा केवळ धार्मिक सण नसून पर्यावरण संरक्षणाची जाणीव करून देणारा उत्सव ठरावा, या उद्देशाने उमेद अभियानाने हा उपक्रम हाती घेतला. महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि हरित ग्रामनिर्मितीचा संदेश गावागावांत पोहोचविला.

या उपक्रमामुळे महिलांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण झाली असून भविष्यातही अशा सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. उपस्थित ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक करत अधिकाधिक वृक्ष लागवड व संवर्धनासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
सदर कार्यक्रम अर्चना बोनसुले तालुका अभियान व्यवस्थापक यांचे मार्गदर्शनात घेण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विवेक हरणे, सुरेश धारणे, हेमचंद बोरकर, सविता उईके, स्वप्ना उराडे, दिपाली दोडके, अलका इनवते, पशु , कृषी व्यवस्थापक व कॅडर यांनी सहकार्य केलेत.








