23 नोव्हेंबर पासून शाळा होणार सुरू
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली माहिती
मुख्य संपादक : कु. समिधा भैसारे
कोरोनाचा प्रार्दुभाव हा प्रत्येक जिल्ह्यात कमी -अधिक प्रमाणात आहे. अशावेळी शाळा चालू करणे आव्हानात्मक असले तरी विद्यार्थ्यांचे आरोग्य व शिक्षण विचारात घेऊनच शिक्षण विभागाने नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. तसेच 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करतांना केंद्र व राज्य सरकारने घालून दिलेल्या निर्बंधाचे पालन करूनच अध्ययन – अध्यापन प्रक्रिया सुरू होणार असून 40 मिनिटांचे चार तासच शाळा होणार असल्याचे त्या म्हणाल्या.
स्थानिक प्रशासनाने शाळा भरवताना योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सुचना शिक्षण विभागाने यापूर्वीच दिल्या आहेत. या सूचनांचे पालन होते आहे की नाही याची तपासणी संबंधित अधिकारी करणार आहेत. शाळा सुरू करण्यापुर्वी जिल्हा प्रशासन व महापालिकेद्वारा शिक्षकांची आरोग्य तपासणी होणार आहे. स्थानिक प्रशासन, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, व्यवस्थापक व सरकार यांच्या सामुदायिक जबाबदारीवर एक दिवस आड करून विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण देण्यात येणार आहे.
असे करत असताना शिक्षकांनी शिकवताना व विद्यार्थ्यानी शिकताना मास्क घालने बंधनकारक आहे. आरोग्य विषयक सर्व नियमांचे पालन शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी वर्गाने केले पाहिजे. ऑनलाईन शिक्षण पध्दती हा एक पर्याय म्हणून स्वीकारला गेला आहे. युट्यूब, गुगल लिंक, झुम, व्हॉट्सएप या माध्यमातून शिक्षण विद्यार्थ्यांपर्यत पोहचवण्यासाठी चांगल्याप्रकारे प्रयत्न केला गेला, परंतु प्रत्यक्ष शिक्षकांद्वारे संवाद व सवंगड्यासोबत शिक्षण अनुभव व ज्ञानार्जन करण्यासाठी शाळा सुरू होत आहेत, असे करताना विद्यार्थ्यांची काळजी घेणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे.
दहावी व बारावीच्या परीक्षा संदर्भात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व शिक्षण तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार लेखी परीक्षा घेण्यात येणार आहेत. सर्व साधारणपणे या वर्षी परीक्षा उशिरा घेण्यात येतील असा अंदाज आहे. विदर्भातील ऊन, कोकणातील पाऊस व इतर जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचा अंदाज घेऊनच मे महिन्याच्या सुरुवातीला परीक्षा होऊ शकतात. कारण राज्यातील सर्व जिल्ह्यातील परीक्षा एकाच वेळी घेणे ही फारच महत्त्वाचे असल्याचे त्या म्हणाल्या.