ना धड रस्ता, ना स्मशानभूमीला शेड
![](https://apnews.co.in/wp-content/uploads/2024/02/IMG-20240229-WA0005.jpg)
पावसाळ्यात गावकरी जीव धोक्यात घालून देतात प्रेतांना अग्नी
काग मधील रास्त मागण्यांसाठी युवा नेता अशिद मेश्राम यांचे दहा दिवसांपासून लाक्षणिक उपोषण
शुक्रवारी होणार चिमूरात भीक मागो आंदोलनआंदोलनाचे नेतृत्व करणार महेश हजारे
नेरी/रामचंद्र कामडी
गेल्या १९ फेब्रूवारी पासून रास्त मागण्यांसाठी काग मुक्कामी रोखठोक प्रहार कामगार संघटनेचे चिमूर तालूका प्रमुख अशिद अमरदिप मेश्राम लाक्षणिक उपोषण करीत आहे.परंतु स्थानिक प्रशासन व शासनाने त्यांच्या आंदोलनाची अद्याप दखल घेतली नाही.चिमुरचे एसडीओ यांनी स्वतः या आंदोलना संदर्भात आढावा जाणून घेतला आहे.चंद्रपूरचे अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी भ्रमणध्वनीवरुन एसडीओ चिमूर यांना या आंदोलनाची माहिती दिली आहे.दरम्यान स्थानिक न.प.च्या मुख्याधिकारी सुप्रिया राठोड यांनी या आंदोलनाची म्हणावी तशी दखल घेतली नाही.त्यामुळे रोखठोक प्रहार कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश हजारे यांनी काग येथील ग्रामस्थांना सोबत घेऊन शुक्रवारी चिमूरात भीक मागो आंदोलन करण्याचा इशारा शासन व प्रशासनाला दिला आहे.काल बुधवारी दुपारी हजारे यांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांची भेट घेऊन उद्या होवू घातलेल्या आंदोलनाबाबत त्यांनी त्यांना निवेदन सादर केले.या पूर्वी त्यांनी पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांना मागण्या व आंदोलन बाबत लेखी निवेदन सादर केले असल्याचे हजारे यांनी या प्रतिनिधीशी काल बोलताना चंद्रपूर मुक्कामी सांगितले.काग गावातील स्मशानभूमीला जाण्यासाठी रस्ता नसून या स्मशानभूमीला शेड नाही अशी गावकऱ्यांची ब-याच दिवसांपासून ओरड आहे.पण सातत्याने नगर परिषदेने या कडे दुर्लक्ष केले आहे.जीव धोक्यात घालून गावकऱ्यांना रस्ता अभावी पावसाळ्यात गावातील प्रेतांना अग्नी द्यावा लागतो ही वस्तुस्थिती आहे.
चंद्रपूरचे जिल्हाधिकारी, जि.प.सिईओ व पोलिस अधीक्षक यांनी स्वतः या स्मशानभूमीची पाहणी केल्यानंतर त्यांना येथील सत्यपरिस्थिती लक्षात येईल.