परभणी रेल्वे स्थानकारील धक्क्यांवरील पार्सल मध्ये आलेल्या धान्यावर डूकरांच्या झुंडी मारताय ताव
संबंधित कंत्राटदाराचे दुर्लक्ष कारणीभूत : शेकडो क्विंटल धान्य मोकाट जनावर करताय फस्त.
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
परभणी येथील रेल्वे स्थानकावरील माल धक्क्यावर मालगाडीतून उतरविलेल्या स्वस्त धान्य दुकानांच्या धान्य साठ्यावर संबंधित कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणामुळे गेल्या दोन दिवसांपासून डुकरांनी मोठा धूमाकुळ घालून शेकडो क्विंटल धान्याची अक्षरशः नासधूस चालवल्याचे निदर्शनास येत असून हेच डुकरांनी खावून खावून धुमाकूळ घितलेले धान्य जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानातून असंख्य गोरगरीब सिधापत्रिका धारकांना पुरवल्या जाणार असल्यामुळे जनसामान्यांतुन संताप व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांना पुरवठा करण्याकरीता रेल्वेच्या मालगाडीतून गुरुवारी पहाटे मोठ्या प्रमाणावर धान्याचा साठा दाखल झाला. मालगाडीतून थेट ट्रकद्वारे धान्याचा तो साठा गोदामांमधून सुरक्षितपणे हलविणे गरजेचे होते. परंतु, या मालवाहू धक्क्यावरील एजन्सीधारक नागनाथ गंगाधरराव पालदेवार यांनी ट्रक व मनुष्यबळ तैनात करीत हजारो मेट्री टन धान्य हलविण्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. धान्याचा तो साठा ट्रक ऐवजी मालवाहू धक्क्यावरील प्लॅटफॉर्मवरच उतरवून रचवण्यात आला. हे करतेवेळी धान्याचे अनेक पोते फुटले. प्लॅटफॉर्मवर दूरपर्यंत धान्य पसरले. परंतु, संबंधित एजन्सीधारकाने ते धान्य हलविण्यापर्यंत सुरक्षित रहावे म्हणून या ठिकाणीसुध्दा कोणताही बंदोबस्त केला नाही. त्याचा परिणाम मोकाट जनावरांसह डुकरांच्या कळपाने या धान्यावर मोर्चा वळविला. अन् गेल्या दोन दिवसांपासून स्वस्त धान्य दुकानांसाठी वितरित होणार्या धान्याच्या या साठ्यावर जनावरे व डुकरांनी मोठा धूमाकुळ घातला आहे. शेकडो क्विंटल धान्याची सर्रासपणे नासाडी केली आहे. दुर्देवाने सर्वसामान्य नागरीकांच्या खाण्यासाठीच्या या धान्याची एवढ्या मोठ्या प्रमाणावर नासाडी होत असतांनासुध्दा एजन्सीधारक पालदेवार यांनी शुक्रवारी सायंकाळ पर्यंत बंदोबस्ताच्या दृष्टीने कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी व प्रत्यक्षदर्शनी चांगलेच संतापले आहेत. यातील काहींनी तो प्रकार जिल्हाधिकार्यांसह प्रशासनाच्या अन्य वरिष्ठ अधिकारी, माध्यमांच्या निदर्शनास आणून दिल्याची माहिती हाती आली असून संबंधित एजन्सीधारकाने मालगाडीतूनच ट्रकद्वारे धान्याचे हे पोते गोदामांमधून हलविणे गरजेचे असतांना ते पोते प्लॅटफॉर्मवर का रचले, असा सवाल केला जात आहे. संबंधित एजन्सीधारकाने याच पध्दतीने याहीपूर्वी धान्याबाबत असाच बेफिकीरपणा दाखविल्याची माहिती काही जाणकारांनी दिलासाशी बोलतांना दिली.