ताज्या घडामोडी

बालाजी सरोज भावकाव्य समुहाचे दुसरे राज्यस्तरीय मराठी संमेलन हे सारस्वतांच्या वाटेवरील महत्वाचे पदचिन्ह -नारायण जोशी

प्रतिनिधी:रामचंद्र कामडी

बालाजी सरोज भावकाव्य समुहाचे २ रे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन हे सारस्वतांच्या वाटेवरील महत्वाचे पदचिन्ह होय , असे विचार संमेलनाध्यक्ष जेष्ठ लेखक नारायण जोशी यांनी व्यक्त केले .
बालाजी सरोज भावकाव्य समुहाचे राज्यस्तरीय दुसरे मराठी साहित्य संमेलन दि . १४ मे २०२३ रोजी रविवारी दत्ताजी मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अत्रे ले आऊट नागपूर येथे अतिशय उत्साहात व थाटात पार पडले . आयोजित संमेलनाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक आणि शिक्षण तज्ञ नारायणराव जोशी होते . संमेलने ही आजची गरज आहे .असे जोशी यांनी आपल्या भाषणातून या वेळी सांगितले.या
संमेलनाचे उद्‌घाटक होते सिनियर सिटीझन कौंसिलचे सचिव सुरेश रेवतकर !त्यांनी संमेलनासाठी मदत करण्यास सदैव तयार आहे असे म्हणून संमेलनातील उपस्थितीतांना शुभेच्छा दिल्या . नांदेडचे प्रा. डॉ. आबासाहेब कल्याणकर आणि येळाहरीचे सरपंच , सामाजिक कार्यकर्ते सचिन इंगळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . यांनीही कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या .
दत्ताजी मेघे इन्स्टिट्यूटचे मिश्राजी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते . खऱ्या साहित्यिकांना मंच मिळायला हवा असे विचार त्यांनी या संमेलनातून मांडले .


आरंभी दीप प्रज्वलन होवून विद्या बोरकर यांनी सरस्वती स्तवन केले .समुह संस्थापक आणि स्वागताध्यक्ष अष्टपैलू व्यक्तीमत्वाच्या धनी नागपूर निवासी सरोज अंदनकर यांनी प्रास्ताविक केले . त्यांनी संमेलनाची भूमिका विशद केली. प्रथम साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक आणि गझलकारा प्रा. सुनंदा पाटील यांनी अध्यक्षपदाची सूत्रे नवीन अध्यक्षांच्या हाती सुपूर्द केली . यावेळी मान्यवरांच्या हस्ते गझलनंदा यांच्या लोकव्रत प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या ” सावली अंबराची ” या गझलसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले . स्त्रीचे भावविश्व उलगडून दाखविणाऱ्या , आणि इत्तरही एकूण १०० उत्तमोत्तम गझलांचा समावेश असणारा हा गझलसंग्रह त्यांनी सुरेश भट यांचा वसा आणि वारसा चालविणाऱ्या गझलकारांना या प्रसंगी अर्पण केला आहे . विशेष म्हणजे ” गझलनंदाच्या गझलेतील स्त्री उद्गार ” हा प्रसाद कुलकर्णी यांचा लेख अतिशय अभ्यासपूर्ण असून , नवीन गझलकारांसाठी ” गझलेचे स्वयंअध्ययन आणि अंकलिपी हा महत्वपूर्ण लेख यात आहे . संमेलनात प्रा . सुनंदा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले . वीणा रारावीकर यांच्या ” गुजगोष्टी शत शब्दांच्या ” या पुस्तकाचेही प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते पार पडले .
या प्रसंगी कै . डॉ . सितारामपंत अंदनकर स्मृती कथासंग्रह पुरस्कार , कै . लक्ष्मीकांत दीक्षित स्मृती काव्यसंग्रह पुरस्कार , कै . शकुंतला दीक्षित स्मृती प्रथम प्रकाशन पुरस्कारांचे वितरण झाले . प्रा . सुनंदा पाटील , प्रसाद कुलकर्णी , पल्लवी उमरे, वर्षा पतके थोटे आशुतोष रारावीकर आदीं विजेते उपस्थित होते .
संमेलनात सिनेजगतातील सुपरिचित माधुरी अशिरगडे यांचाही या वेळी मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

यानंतर गझलनंदा यांच्या अध्यक्षतेखाली एक दमदार गझल मुशायरा झाला . श्रेत्यांची वारंवार दाद घेत अनेक गझलकारांनी आपल्या गझल सादर केल्या .
नांदेडचे प्राचार्य डॉ. आबासाहेब कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि संमेलनाध्यक्षांच्या उपस्थितीत निमंत्रितांचे बहारदार कविसंमेलन पार पडले . यावेळी ४० कवींनी आपल्या कविता सादर केल्या . जालना येथील दिव्यांग कवी आकाश देशमुख यांची संमेलनाला उपस्थिती हा या संमेलनाचा वैशिष्ट्यपूर्ण भाग होता .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋचा वगरकर आणि प्रा. भारती दवणे यांनी सुरेखरित्या केले . सह आयोजक श्रीराम अंदनकर यांची कार्यक्रमाच्या यशस्वितेत प्रमुख व महत्वाची भूमिका होती .
या एकदिवसीय संमेलनात श्रोत्यांची आणि संमेलनाध्यक्षापासून सर्व निमंत्रितांची शेवटपर्यंत उपस्थिती ही विशेष बाब होती .
अतिशय उत्साहात हे संमेलन पार पडले . पार पडलेल्या या एक दिवशीय संमेलनाची अनेकांनी प्रशंसा केली.

कृपया बातमीला जास्तीत जास्त शेयर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close