कर्तव्यनिष्ठे वरच सर्वांगीण विकास अवलंबून- शिक्षणाधिकारी विक्रम सारुक
![](https://apnews.co.in/wp-content/uploads/2021/12/IMG-20211208-WA0223.jpg)
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
माजलगाव नातं व कर्तव्य यांच्यात अंतर ठेवता येत नाही, प्रत्येकाने आपल्या कर्तव्याशी निष्ठ राहून कार्य केल्यास समाज व राष्ट्र सामर्थ्यशाली बनते,यावरच व्यक्तीचा सर्वांगीण विकास अवलंबून आहे.त्याग, भक्ती आणि जबाबदारीच्या भावनेतून कार्य सिध्दी प्राप्त होते . कर्तव्य निष्ठेवरच सर्वांगीण विकास अवलंबून आहे. असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी विक्रम सारुक यांनी केले. ते श्री सिध्देश्वर शैक्षणिक संकुलात गुणवंत विद्यार्थी गुणगौरव व नुतन इमारतीच्या पायाभरणी समारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा भारतीय प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेंद्र आलुरकर, प्रमुख उपस्थितीत उपेंद्र कुलकर्णी (सेवाप्रमुख- राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पश्चिम क्षेत्र), मोहनराव काकडे (उपशिक्षणाधिकारी), राधेश्याम लोहिया (उपाध्यक्ष – भा शि प्र संस्था),प्रा चंद्रकांत मुळे, डॉ हेमंत वैद्य (सहकार्यवाह – भा शि प्र संस्था), तसेच श्री सिध्देश्वर शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष प्रकाश दुगड, कार्यवाह अमरनाथ खुर्पे इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, सरस्वती व भारत माता पूजनाने झाली. यानंतर मान्यवरांच्या हस्ते नुतन इमारतीच्या पायाभरणी पूजन संपन्न झाले. तसेच शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचे गुणगौरव व कौतुक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी भा शि प्र संस्था व जनकल्याण समिती यांच्या प्रयत्नांमुळे इन्फोसिस पुणे यांच्या कडून मिळालेल्या संगणकांचे संस्थेतील अनेक शैक्षणिक संकुलांना वितरण करण्यात आले.
यावेळी उपस्थित विद्यार्थी, पालक व शिक्षकांना मार्गदर्शन करताना उपेंद्र कुलकर्णी यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांचे चारित्र्य निर्माणासाठी शिक्षकांचे योगदान महत्त्वाचे आहे. शालेय जीवनात व्यक्तीमत्वाचा सर्वांगीण विकास करुन संवेदनशीलता व कृतीशिलता जीवनात आली पाहिजे. प्रमुख उपस्थितीत प्रा चंद्रकांत मुळे यांनी संस्थेची भूमिका मांडताना सांगितले की, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार त्यांच्या भावी आयुष्यासाठी प्रेरणादायी आहे. आपल्या संस्थेमध्ये गुणवत्ते बरोबर राष्ट्र प्रेम तसेच सामाजिक जाणिव असलेले विद्यार्थी घडवले जातात.
या कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणात डॉ सुरेंद्र आलुरकर यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सम्यक भान शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करून नेशन बिल्डर चे काम करावे. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संकुलाचे कार्यवाह अमरनाथ खुर्पे यांनी सांगितले की, संस्कार व शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे खांदे मजबूत करण्याचे काम संकुलातील शिक्षक करत आहेत. भा शि प्र संस्था व जनकल्याण समिती यांच्या प्रयत्नांमुळे इन्फोसिस पुणे यांच्या कडून मिळालेल्या संगणका बद्दल धन्यवाद दिले. या कार्यक्रमाचे आभार उपमुख्याध्यापक विजयेंद्र चौधरी यांनी तर सुत्रसंचालन प्रा डॉ विकास जाधव व श्रीमती सत्यभामा मोरे यांनी केले. तर सांगता संपूर्ण वंदे मातरम् ने झाली. यावेळी सर्व माजी आ मोहनराव सोळंके, अभय कोकड, प्रेमकिशोर मानधने, अॅड विश्वास जोशी, जगदीश साखरे , सर्व संस्था सभासद प्राचार्य डॉ महेश देशमुख, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा मुख्याध्यापक बाबुराव आडे गुरुजी, मुख्याध्यापक प्रदीप जोशी, श्रीमती वंदना मिटकरी, शहरातील शाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर साळेगावकर,अभिमन्यू इबिते,लक्ष्मण जगताप यांच्यासह गुणवंत विद्यार्थी, पालक, पत्रकार तसेच माजी विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. हा कार्यक्रम कोविड-१९ च्या सर्व नियमांचे पालन करुन घेण्यात आला.