पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना व्हॉइस ऑफ मीडियाचे निवेदन

प्रतिनिधी:रामचंद्र कामडी
राज्यातील वृत्तपत्र उद्योगास आर्थिक बळकटी देण्यासाठी जाहिरात दरात १५० टक्के वाढ करण्यात यावी व पत्रकारांसाठी विविध प्रशासकीय धोरणांमध्ये सुधारणा कराव्यात आदी मागण्यांसाठी व्हॉईस ऑफ मीडिया चिमूर शाखेच्या वतीने मंगळवार २४ मार्च रोजी तहसीलदार यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले आहे.
वृत्तपत्र उद्योग हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून कार्यरत असून शासनाच्या योजना, निर्णय व धोरणे जनतेपर्यंत पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे निवेदनात नमूद करून गेल्या काही वर्षांत कागद, प्रिंटिंग साहित्य, वीज व इतर खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असतांनासुद्धा जाहिरात दरात मात्र अपेक्षित वाढ झाली नाही.

त्यामुळे लघु व मध्यम वृत्तपत्रांचे अस्तित्व धोक्यात आले असल्याची चिंता व्यक्त करीत ई-टेंडर जाहिराती पूर्ण स्वरूपात वृत्तपत्रांत प्रसिद्ध करणे, जाहिरातींसाठी किमान आकार निश्चित करणे, शासकीय जाहिरातींचे देयक ३० दिवसांत अदा करणे, लघु व मध्यम वृत्तपत्रांना समान संधी देणे तसेच शासन निर्णय व बैठकींची माहिती पारदर्शकपणे प्रसिद्ध करणे, जिल्हास्तरावर जाहिरात वितरणात होत असलेला भेदभाव थांबवून सर्व जाहिराती माहिती खात्यामार्फतच देण्यात याव्यात आदी मागण्या शासनाकडे करत जाहिरात यादीत समावेशासाठी वृत्तपत्रांनी केलेल्या अर्जांची तातडीने तपासणी करून त्यांना न्याय देण्याची अपेक्षा ही या निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
निवेदन देतेवेळी व्हॉईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष पंकज मिश्रा, तालुका सरचिटणीस शुभम बारसागडे, उमेश शंभरकर, जितेंद्र सहारे, फिरोज पठाण, संजय नागदेवते, नितीन पाटील, विकास खोब्रागडे, सुनील कोसे, प्रमोद राऊत, विलास मोहिणकर, शार्दूल पचारे, विलास कोराम, इम्रान कुरेशी, पिंटू नागोसे, रोशन जुमडे, योगेश अगडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. या सर्व मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.








