शेतकऱ्याकडून जमा केलेल्या लोकवर्गणीचा अधिकाऱ्यांनी हिशोब द्यावा
सखाराम बोबडे पडेगावकर यांनी विचारला जाब
जिल्हा प्रतिनिधी:अहमद अन्सारी परभणी
टाकळवाडी कालवा दुरुस्तीच्या नावाखाली मागील दोन वर्षे शेतकऱ्याकडून लोकवर्गणी जमा करून गोळा केलेल्या पैशाचा हिशोब अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना द्यावा असा जाब परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी गंगाखेड येथील सिंचन शाखा कार्यालयात बुधवारी शेतकरी व अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत विचारला.
टाकळवाडी तलावाच्या अंतर्गत येणाऱ्या कालव्यातील लाभधारक शेतकऱ्यांची बैठक आज सिंचन शाखा कार्यालय मासोळी येथे दुपारी पार पडली .टाकळवाडी अंतर्गत गुंजेगाव शिवारात असणाऱ्या कालवा खराब झाला आहे. ठिकठिकाणी झाडे-झुडपे वाढले असून त्यात गाळ साचला आहे. अशा परिस्थितीत पाणी सोडले तर शेवटच्या टोकापर्यंत पाणी जाणे शक्य नाही. तरी या कालव्याची दुरुस्ती करून बाजूचा पथ रस्ता दुरुस्ती कराअशी मागणी परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी पंधरा दिवसांपूर्वीच लेखी स्वरूपात केली होती. रब्बी हंगामातील पिके असल्याने येथील शेतकऱ्यांनी आज बुधवारी सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या नेतृत्वाखाली सिंचन शाखा कार्यालय अधिकारी वासनिक यांना विचारपूस केली. त्यांची दुरुस्ती कधी होणार? चाऱ्यावर पूल उभारणी, ओढ्यावरील पूलाची उभारणी ,वायपण दुरूस्ती, मागील दोन वर्षे शेतकऱ्या कडून दुरूस्ती च्या नावाखाली घेतलेल्या पैशाच्या पावत्या कधी मिळतील आदी विषयावर चर्चा झाली. तसेच येत्या पाच दिवसात कालवा दुरूस्ती कामास सुरुवात होईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी सखाराम बोबडे पडेगावकर, जयवंत कुडगिर, कालिदास पोळ ,रमेश मोटे, विश्वनाथ मोटे, पांडुरंग मोटे, कैलास मोटे ,लक्ष्मण मोटे बाळासाहेब मोटे, माजी सरपंच विक्रम इमडे सह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.