शासकीय दराने रेती उपलब्ध करून देण्याची घोषणा हवेत

अवैध रेती तस्करी जोरात
घरकुल लाभार्थ्यांची शासनाव्दारे फसवणूक राजू झोडेंचा आरोप
प्रतिनिधीःरामचंद्र कामडी
शिंदे-फडणवीस-पवार सरकारने घरकुल लाभार्थ्यांना शासकीय दराने रेती उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती.मात्र चंद्रपुर जिल्ह्यासह बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील घरकुल लाभार्थ्यांना अद्याप रेती उपलब्ध करून देण्यात आली नाही.त्यामुळे घरकुल लाभार्थ्यांची शासनाने फसवणूक केली असून अनेकांच्या घराचे स्वप्न अर्धवट राहिले आहे.दरम्यान जिल्ह्यातील रेती घाटांचा लिलाव करावा किंवा लाभार्थ्यांना रेती स्वस्त दरात उपलब्ध करून द्यावी अशी मागणी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी आज केली आहे.
या जिल्ह्यात अनेक रेती घाट आहेत.या रेतीघाटांचा अद्याप शासनाने लिलाव केला नाही.परंतु रेती तस्कर दिवसरात्र रेतीची अवैध तस्करी करत असून ज्यादा भावाने रेतीची बेभानपणे विक्री करत आहेत.यात घरकुल लाभार्थ्यांची आर्थिक फसवणूक होत असून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे.तर एकट्या बल्लारपूर तालुक्यात एक हजार 242 घरकुल लाभार्थी असून रेती पुरवठा होत नसल्याने काम रखडले आहे. शासकीय रेती उपलब्ध करून देण्याचे शासनाचे धोरण फोल ठरले असून जिल्ह्यातील रेती घाटांचा तात्काळ लिलाव करावा, तसेच शासनाने रेती शासकीय दराने उपलब्ध करून द्यावी अशी मागणी राजू झोडे यांनी केली आहे.यावेळी श्यामभाऊ झिलपे,संपत ,गुरू कामटे,जाकिर खान , भगतसिंह झगड़ा,नविन डेविड पंचशील तामगाडगे, आदि उपस्थित होते.