रानभाज्यांचा समावेश दैनंदिन आहारात व्हावा – संजय गजपुरे
ग्रामीण प्रतिनिधी:कु.कल्यानी मुनघाटे मिंडाळा ता. नागभीड
रानभाज्या आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त व महत्वाच्या आहेत. पचनासाठी, श्वसनासाठी , शारीरिक स्वास्थ्यासाठी , उत्तम आरोग्यासाठी व विशेष म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी या रानभाज्या अतिशय उपयुक्त असल्याने या बहुगुणी रानभाज्यांचा समावेश नागरिकांनी आपल्या दैनंदिन आहारात करण्याचे आवाहन जि.प.सदस्य संजय गजपुरे यांनी नागभीड तालुका रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन प्रसंगी केले.
आदिवासी दिन व श्रावण मासारंभाचे औचित्य साधून तालुका कृषी विभाग व राणी हिराई शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड , नागभीड च्या संयुक्त विद्यमाने चिंधीचक येथील जि.प.प्राथमिक शाळेच्या आवारात तालुका रानभाज्या महोत्सवाचे उद्घाटन जि.प.सदस्य संजय गजपुरे यांच्या हस्ते करण्यात आले . नागभीड तालुका कृषी अधिकारी कु.एस.डी.गजबे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या मेळाव्यात पं.स.सदस्य संतोष रडके , चिंधीचक चे उपसरपंच प्रदिप समर्थ , राणी हिराई शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड च्या अध्यक्षा सौ. धोंगडे , तळोधी च्या मंडळ कषी अधिकारी कु.पी.एस.शिंदे , उमेद अभियानाचे कृषी व्यवस्थापक मोडक , गोविंदबाग रोपवाटिकेच्या संचालिका सौ.आरती भेंडारकर यांची प्रमुख उपस्थिती होती पावसाळ्याच्या सुरुवातीला रानभाज्या जंगलात व शेतशिवारात उगविल्या जातात. या रानभाज्यांची चव आणी औषधी गुण वेगळीच असते . या रानभाज्यांची ओळख व महत्त्व लक्षात घेता नागरिकांनी रानभाज्या खरेदी करण्यासाठी कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ( आत्मा ) च्या वतीने राज्यात ठिकठिकाणी अशा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. तालुक्यात या आठवड्यात अनेक ठिकाणी रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी कु.गजबे यांनी याप्रसंगी दिली.
चिंधीचक येथे परिसरातील अनेक महिला बचत गटांनी यात सहभाग नोंदवित विविध रानभाज्यांचे स्टॅाल लावले होते. याला परिसरातील नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला . या महोत्सवाचे संयोजन सौ.वर्षा लांजेवार यांनी स्विकारले होते. सुत्रसंचालन कृषी पर्यवेक्षक संजय पाकमोडे यांनी केले तर आभार कृषी सहाय्यक अमोल शिरसाठ यांनी मानले .